मुंबई : ‘भारताच्या संविधानाचे सर्वोच्च महत्त्व टिकवून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. संविधानामध्ये तरतूद केल्याप्रमाणे जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी राष्ट्रपती झाल्यावर सर्वतोपरी प्रयत्न करीन,’ अशी ग्वाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी १५ जुलै रोजी मुंबईत दिली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोविंद विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास ‘रालोआ’च्या नेत्यांनी व्यक्त केला.
‘रालोआ’च्या घटक पक्षांच्या महाराष्ट्रातील आमदार-खासदारांची भेट घेण्यासाठी कोविंद आले होते. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवसेना नेते व राज्याचे मंत्री सुभाष देसाई, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे मंत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री अनंत गीते, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, भाजप विधिमंडळ मुख्य प्रतोद आमदार राज पुरोहित, बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार नित्यानंद राय व खासदार सुनील सिंग उपस्थित होते. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे उपस्थित होते. बैठकीला ‘रालोआ’तील घटक पक्षांचे नेते, मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.
रामनाथ कोविंद म्हणाले, ‘देशातील सर्व राज्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व सर्वांना समान न्याय मिळावा, देशातील युवा वर्गाच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, तसेच शिक्षणाचा प्रसार व आधुनिकीकरण हे प्राधान्याचे विषय असतील. राष्ट्रपतिपदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन.’
नितीन गडकरी म्हणाले, ‘रामनाथ कोविंद हे मोठे कर्तृत्व आणि व्यासंग असलेले शालीन व्यक्तिमत्त्व आहे. ‘रालोआ’ने राष्ट्रपतिपदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली आहे. त्यांना ऐतिहासिक यश मिळेल.’
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कोविंद यांच्याकडे संघटन कौशल्य व प्रशासकीय कौशल्य आहे. ते संविधानाचे जाणकार आहेत. त्यांना महाराष्ट्रातून मोठे मताधिक्य मिळेल.’
रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले, ‘स्वच्छ प्रतिमा, साधेपणा व विनम्रता ही रामनाथ कोविंद यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे.’
सुभाष देसाई यांनी सांगितले, ‘रालोआच्या उमेदवाराला विजयी करण्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे सर्व खासदार व आमदार रामनाथ कोविंद यांना मते देतील.’
रामदास आठवले म्हणाले, ‘आंबेडकरी चळवळीशी संबंध असलेले रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होणार याचा सर्वांना आनंद आहे. मी त्यांना रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी चळवळ व दलित जनतेतर्फे शुभेच्छा देतो.’
कैलास विजयवर्गीय यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणूक कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन केले.